गु

ढीपाडवा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा करतात. या दिवशी चैत्र प्रतिपदा असते. हा भारतीय नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून मानतात व साजरा करतात. हा वसंत पंचमी चा पहिला दिवससही मानतात. गुढीपाडवा याचा अर्थ गुढी म्हणजे “ध्वज” व पाडवा म्हणजे प्रतिपदा, चंद्राच्या 15 दिवसांमधील पहिला दिवस. ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असेही मानल्या जाते. कारण ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली असे पुराणच सांगितले आहे. व ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे असे मानतात. तेव्हा या दिवशी ब्रह्मदेवाची सुद्धा पूजा केली जाते व प्रार्थनाही केली जाते. इतर दिवशी किंवा वर्षभर कधीही ब्रह्मदेवाची पूजा, प्रार्थना करत नाहीत. असे हे या दिवसाचे खास महत्त्व आहे. याला सण व विजय उत्सव असे दोन्हीही प्रकारे साजरे करतात. समाजात सर्व एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात.
सजावट
या दिवशी नवीन वेळू किंवा बांबू किंवा काठीला सुंदर नवीन रंगीबेरंगी वस्त्र किंवा साडी नेसवतात.
त्त्याच्या वरच्या टोकावर नवीन तांब्याचा, पितळेचा गडू ठेवून त्यावर चंदन व कुंकूने स्वस्तिक काढतात. कडुलिंबाची डहाळी, पाने व आंब्याची फुले, पाने तसेच साखरेची गाठीमाळ व लाल फुलांची माळ त्यावर घालतात. अतिशय सुंदर व प्रसन्न असे हे प्रतीक दिसते. मग घरातील सर्वजण याचे विधीवत पूजा करतात. विघ्नहर्ता गणपतीचे स्मरण करतात. ही पूजा घराबाहेर अंगणात करतात किंवा आजकाल फ्लॅट सिस्टम म्हणून मुळे घरातील खिडकीवर ही गुढी उभारतात. या दिवशी सर्वजण खूप खुश असतात. पूजा झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटतात. जेवणात व नैवेद्यासाठी श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळी इतर पदार्थ व कडुलिंबाची चटणी असा खास बेत असतो.
गुढीपाडवा हा पारंपारिक सण आहे. वेदांगज्योतिष्य या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन व्यवसाय, नवीन घर, नवीन फ्लॅट, नवीन दुकान, नवीन उपक्रम, नवा व्यवसाय तसेच सोने-चांदी इत्यादी खरेदी केल्या जाते.
या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर व अंगण-परिसर स्वच्छ करतात. प्रवेशदारावर आंब्याच्या पानांचे व फुलांचे तोरण बांधतात. तसेच उंच वेळू किंवा बांबू घेऊन त्याला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. फुलांचा हार, साखरेची गाठी त्यावर कडुलिंबाची पानं, आंब्याचे फुले व गाठी, साखरेची किंवा बत्ताशाची गाठी माळ. लाल पांढऱ्या फुलांचा हार, अर्पण करतात. गडूवर स्वस्तिकाचे चिन्ह काढून गुडी तयार करतात. गुढीच्या बांबू खाली पाट ठेवतात. गुढीला उंच दिसेल असे बांधतात. त्याला उभारणे असे म्हणतात. चंदनाचा, गंध, फुले, अक्षदा वाहतात. नंतर तुपाचे निरंजन लावून अगरबत्ती दाखवतात. दुपारी नैवेद्य दाखवून परत नमस्कार करतात. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी, पुरणपोळी किंवा बासुंदी पुरी असा बेत असतो. हे सर्व असले तरी कडुनिंबाच्या झाडाचे महत्व आजच्या दिवशी फार आहे. कडुलिंब हा गुणाने गुणधर्माने थंड आहे. वसंत ऋतू, नंतर ग्रीष्म ऋतू येतो. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी कडुनिंबाचा वापर या ऋतूत सांगितला आहे. या दिवशी कडुलिंबाच्या पानांची चटणी जेवणामध्ये अवश्य वाढतात.
भारतात इतर अनेक राज्यातही चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा दिवस साजरा करतात. फक्त त्याची नावे वेगवेगळी आहेत. जसे कुठे “विजयदिवस” किंवा “विजयदिन” म्हणतात. तर कुठे संवत्सर, पाडवा किंवा उगादी/ युगादी असे नावे आहेत. सिंधी प्रांतात “चेटीचंदड” असे या सणाला म्हणतात. गुढीपाडव्याच्या दिवशी जो दिवस म्हणजे वार असेल त्या वाराचा जो ग्रह आहे तो त्या सहवासाचा संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. साठ संवत्सराची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केलेली आहे. एका विभागात पाच सवत सणांचे एक योग असा पद्धतीने साठ संवर्धनाची बारा युगे मानली जातात. ब्रह्मादेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली आहे तिला पहिले पद मिळाल्याने ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते.
कथा
1.महाभारताच्या आदी पर्वात एक कथा आहे.इंद्राला कमळाची काठी दिली होती. इंद्राच्या आधारासाठी काठी जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी त्या काठीची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून ती शृंगावरून पुष्प माला बांधून तिची पूजा करतात.
2. दुसरी कथा ही महाभारतातच आहे. श्रीकृष्ण हा त्याच्या सवंगड्यांना इंद्र व इंद्र लोकांची पर्वा न करता वार्षिक इंद्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदी पर्वात हा उत्सव वर्षप्रतीपदेला करण्याचे सुचविलेले आहे.
3.हिंदू धर्मात त्रिदेवांचे महत्त्व आहे. त्यातील ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले असे पुराणात मानतात. हा पुराणात संदर्भ आहे.तेव्हा पाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले म्हणून नूतन वर्षाचा पहिला दिवस म्हणून हा साजरा केला जातो.
4.श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास संपवून लंकाधिपती राक्षस रावणाचा पराभव केला. व त्यानंतर या दिवशी अयोध्येत प्रवेश केला.
5. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन शालिवाहन शक याच दिवशी सुरू केलेले आहे. त्याची कथा अशी शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलांनी शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार छोटे छोटे सैनिकाचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी युद्ध करून शकांचा पराभव केला.
6.प्राचीन काळी माणसाला जेव्हा “दैवीशक्ती” ची गरज भासू लागली. तेव्हा देवीची शक्तीसाठी मनुष्य पूजा करायला लागला. ही सुरुवात केली ती याच दिवशी. स्त्रीच्या रूपात देवी असते. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता श्रीपार्वती असे मानले जाते.
7. शंकराचे लग्नही पाडव्याच्या दिवशी ठरले होते. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात. शंकर-पार्वतीच्या लग्नाला पाडव्यापासून तयारी सुरू होऊन तृतीयेला लग्न झाले होते असे म्हणतात.
आरोग्यदृष्ट्या महत्त्व
उन्हाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे आजच्या दिवशी ओवा, मीठ, हिंग, मिरी, खडीसाखर आणि कडुलिंबाचे पाने वाटून त्याची चटणी बनवतात. यामुळे त्वचारोग बरा होतो. प्रकृतीला थंड वाटते. पित्तनाश होतो. आंघोळीच्या पाण्यातही कडुनिंबाचे पाणी टाकली जातात त्यामुळे त्वचेचा दाह कमी होतो. अशा प्रकारे आपल्या पारंपारिक सणांमध्ये आरोग्याचा विचार करून सण साजरे करतात.
