इसाप

Spread the love

11. गुलामगिरी दूर केली

               त्या काळातील लोकांचा, तसेच झांथसचा सुद्धा “शकुन-अपशकुन” यावर भरपूर विश्वास होता. काही काही लोकांना तर स्वप्नात सुद्धा “शकुन-अपशकुन” व्हायचे! म्हणजे दिसायचे. आणि त्यावर तेथील प्रदेशातील लोकांचा जास्तच विश्वास होता.

              समाॅस मधील एका शहरात शिक्क्याची अंगठी एकदा एका घारीने उचलून नेली. ती अंगठी अत्यंत महत्वाची आणि सर्वांना अतिशय प्रिय होती. उडत उडत घारीने ती अंगठी एका गुलामाच्या मांडीवर टाकली! झाले! त्या घटनेतील शकुन-अपशकुनची चर्चा सुरू झाली. या घटनेचा परिणाम काय होणार? आपणावर एखादे संकट येणार की, लोकांचे भले होणार? की आणखीन काय होणार? सारे लोक चिंतातुर झाले!

               काही मंडळी झांथसकडे आली. त्यांनी त्या घटनेचा अर्थ त्याला विचारला.झांथसने तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने त्या दोन गोष्टींवर खूप विचार केला. पण त्याला काहीच सूचेना. शेवटी तो लोकांना म्हणाला, या घटनेचा अर्थ तुम्हाला, माझा “गुलाम मित्र” नीट उलगडा करून सांगेल.

                    मग सर्व लोकांची मोठी सभा भरली. इसाप सर्वांना संबोधून बोलू लागला, “घार हा एक दृष्ट प्राणी आहे. हे आपल्या सर्वांना मान्य आहे, असे मी समजतो. त्याने आपल्या शहराच्या “मानाचा” ठसा नेला. या घटनेचा अर्थ असा की, आपणावर आता परचक्राचे फार मोठे संकट येणार आहे. म्हणून सर्वांना “सावध” होऊन शत्रूचा बंदोबस्त करण्याची तयारी केली पाहिजे. अंगठी एका गुलामाच्या मांडीवर टाकली आहे. यावरून राज्याची सत्ता गुलामांच्या “स्वाधीन” होणार आहे. त्यासाठी आपण प्रथम आपल्या देशातील ही गुलामगिरीची प्रथा नष्ट केली पाहिजे. तरच आपली लोकसत्ता अबाधित राहील. पहा नीट विचार करून, काय ते करा. पण लवकर करा!”

             इसापचे अशा प्रकारचे बोलणे, सर्व लोकांना पटले. त्यांनी एकमताने ठराव केला की, यापुढे गुलामगिरी बंद करून टाकायची. मग सर्व गुलाम नागरिक बनून साऱ्यांना तेथील राज्यात समान हक्क मिळतील. लोकराज्य अबाधित होईल. संकट पूर्णपणे टाळेल. त्याप्रमाणे लोकांनी लगेच इसापची गुलामगिरीतून मुक्तता केली. आणि सर्वानुमते त्याला “स्वतंत्र नागरिक” म्हणून सन्मान मिळाला.तो आता स्वतंत्र नागरिक झाला. व अशा प्रकारे हळूहळू इतरही गुलामांची मुक्तता होऊन ते सुद्धा स्वतंत्र नागरिक झालेत. आता सर्वांना समान हक्क मिळायला लागलेत.

           सॅमाॅस शहरांमधील सारे गुलाम आता स्वतंत्र नागरिक झाले होते. इसाप एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून मोठ्या सन्मानाने तेथे राहू लागला. त्याचा मित्र झांथस त्याच्याशी प्रेमाने व आदराने वागू लागला. इतरही लोक त्याच्यासोबत आदराने वागू लागले होते. अनेक लोक इसापकडे रोज येत.आपल्या सर्व अडी-अडचणी इसापला सांगत. शंका-कुशंका विचारीत आणि ईसापही मोठ्या चातुर्याने त्यांना नीती कथा सांगून त्यांचे समाधान करी. तो नेहमी गोष्टी सांगून लोकांना बोध करीत असे. त्याची ती रीत सर्वांना खूप आवडे. तो सगळीकडे प्रसिद्ध असा पुरुष ठरला.

12. इसाप चे लग्न

                       इसाप गुलामगिरीतून स्वतंत्र झाल्यावर लवकरच त्याचे लग्नही झाले. त्याच्या बायकोला नटण्या मुरडण्याची भारीच हौस होती. इसापची स्वतःची राहणी मात्र साधी व गरिबीची होती.आता तो शिक्षकाचा धंदा करू लागला.

                       एकदा तर त्याची बायको उंची वस्त्रे नेसून आणि दागिने घालून एका सरदाराच्या घरी समारंभासाठी निघाली. वास्तविक तिला त्या समारंभाचे निमंत्रण नव्हते. पण ती उगाच डामडौल करून आपले दागिने दाखवण्यासाठी चालली होती. तेव्हा इसापने तिला एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, एकदा एका सरदाराकडे पाहुणे आले होते पाहुण्यांसाठी मेजवानीचा बेत चालला होता. स्वयंपाकातील खमंग गरम मसाल्याचा खमंग सुवास घरभर दरवळत होता. सरदाराच्या कुत्र्याला आनंद झाला. तो धावत पळत आपल्या मैत्रिणीकडे गेला. त्याने तिला घरी आणले. मेजवानीचा तो स्वयंपाक केला होता तो दाखविला. आपण आता त्या पंचपक्वांनावर मस्तपैकी ताव मारू असे तो कुत्रा, आपल्या मैत्रिणीला म्हणाला. थोडावेळ थांबल्यावर मालकाचा कुत्रा दुसऱ्या दालनात गेला. पण ती कुत्री स्वयंपाक घरातच घोटाळत राहिली. कारण सुवास दरवळत असल्यामुळे तिच्या तोंडाला पाणी सुटले होते. ती शेपूट हलवीत लाडे लाडे आच्या-याच्या जवळ गेली,तिच्या शेपटीचा फटका आचाऱ्याला लागला त्यामुळे त्याला तिचा राग आला आणि तिच्या तंगडीला धरून तिला खिडकीतून बाहेर फेकून दिले. ती कुत्री बाहेर रस्त्यावरील फरशीवर आपटली. त्यामुळे तिच्या तोंडातून क्याॅव क्याॅव क्याॅव आवाज निघाला.ती पळत-पळत निघून गेली. रस्त्यावरील अनेक कुत्रे तिला काय झाले, काय झाले ताई? असे विचारत होते. पण ती बिचारी कुत्री काही न बोलता दूर निघून गेली. कुत्रीची गोष्ट ऐकून इसापची बायको मनात वरमली. तिने त्या सरदाराच्या घरी जाण्याचा बेत रद्द केला. त्या पुढे कधीही ती आमंत्रणा शिवाय दुसऱ्याच्या घरी गेली नाही.

                अशाप्रकारे पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगून इसाप मोठ्या खुबीने घरच्या व बाहेरच्या सर्वांना नीती पाठ शिकवीत असे. पशुपक्ष्यांच्या स्वभावाबाबत त्याचे दांडगे निरीक्षण होते. ते निरीक्षण व्यवहारातील नीती पटवण्यासाठी फारच उपयोगी पडेल. लोक त्याला “गोष्टी-वेल्हाळ” ईसाप म्हणत.

13. वस्तूंची योग्यता

                एकदा एका बैठकीत काही टवाळखोर लोक इतरांची टिंगल करीत होते. तेव्हा ईसाप म्हणाला, “एका लेखकाने एक लेख लिहिला. कंटाळा येताच त्याने चष्मा काढून टेबलावर ठेवला आणि तपकीर ओढून ती डबीच्या चष्मा जवळ ठेवली. तपकिरीची डबी चष्माला म्हणाली,” पाहिलेस माझ्यामुळे मालकाचे डोके शांत राहते आणि मग तो बडा लेखक म्हणून प्रसिद्ध मिळवतो”, त्यावर चष्मा शांतपणे तिला म्हणाला, अग चिमुरडे, मी नसलो तर धन्याला वाचताच येणार नाही; मग तो कसले लेख लिहिणार? तुझी वळवळ केवळ करमणुकीसाठीच!’ अशाप्रकारे शांतपणे तपकिरीच्या डबीला तिची जागा दाखवली.


Spread the love

Leave a Comment

Recommended
                    १६ संस्कार काय आहेत? – सोपी आणि स्पष्ट माहिती…
Cresta Posts Box by CP
Index