हिंदू धर्मात श्रावणातील राखी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. जलतत्व हे पृथ्वीला जास्त प्रमाणात व्यापून आहे. हे तत्व समुद्रात मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहे. पंचमहाभूतांपैकी “जलतत्व “आहे त्याचा आदर करण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजा झाल्यावर नारळ व दिवा समुद्राला अर्पण करतात व त्याचे आभार मानतात. हा सण बहिण भावांचा सण म्हणून ओळखला जातो. तो द्वापार युगापासून सुरू आहे. श्रीकृष्णाला द्रौपदीने आपला भरजरीचा पितांबर/ शालू फाडून त्याच्या दुखावलेल्या बोटाची रक्षा व्हावी,म्हणून पट्टी बांधली होती. तिची तत्परता व प्रेमभाव पाहून श्रीकृष्ण भारावून गेला. तेव्हापासून हा सण बहिण-भावाचा म्हणून मानला जाऊन लागला. पूजेच्या थाळीत रोली, कुमकुम,अक्षद, नारळ, मिठाई ,दिवा ठेवतात. डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा लागतो, मग भावाला औक्षण करून उजव्या हाताला राखी बांधतात, मग ओवाळतात. मग ती बहीण, महिला किंवा स्त्री भावाला दीर्घायु लाभो,आरोग्य चांगले राहून त्याची सफलता सतत होत राहो यासाठी प्रार्थना करते. तसेच भाऊही बहिणीचे जीवन आनंदी राहावं, संकट मुक्त राहून ती नेहमी खुश हाल व सुखी असावी अशी प्रार्थना करतो. मग बहिण भावामध्ये जो कोणी लहान असेल तो मोठ्या बहिण भावाच्या पाया पडतो व आशीर्वाद घेतो. ज्यांचा भाऊ बाहेरगावी आहे दूर आहे किंवा परदेशी आहे ते आठ-दहा दिवस आधीच राखी पाठवतात. हा सुंदर, पवित्र सण आहे, हा सण आपण ईश्वराला राखी बांधून, गुरु व शिक्षक तसेच सैनिकांना राखी बांधून साजरा करतो सैनिक दिवस रात्र आपले रक्षण करतात. देशाचे रक्षण करतात. तेव्हा त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपण त्यांना राखी बांधली पाहिजे. ज्यांना बहीण नाही ते मानलेल्या बहिणीकडून राखी बांधू शकतात. ही राखी म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक आहे.