Table of Contents:
1. वटपौर्णिमा म्हणजे काय?
2. सावित्री-सत्यवान कथा
3. वडाच्या झाडाचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व
4. पर्यावरण पूजनाचा संदेश
5. नारीशक्ती आणि व्रताचे प्रतीक
6. वटपौर्णिमा व्रत कसे करावे?
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा होय. उत्तर भारतात हे व्रत अमावस्या तिथीला पाळले जाते. महाराष्ट्र, गुजरात सह दक्षिण भारतात हे व्रत पौर्णिमा तिथीला पाळले जाते.हा उत्सव भारतातील अनेक राज्यांमध्ये विवाहित महिलां साजरा करतात. वडाच्या झाडाची पूजा करून केला जाणारा हा उत्सव आहे.
वटपौर्णिमा म्हणजे काय?
हा उत्सव महाभारतातील कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे “सती-सावित्री व सत्यवान” राजा यांच्या कथेवर आधारित आहे. सावित्री ही अतिशय गुणवान कन्या होती. तिच्या वडिलांनी तिला आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. तिचे व्यक्तिमत्व आदर्श असे होते. ती सर्वगुणसंपन्न अशी भारतीय स्त्री होती. त्यामुळे तिने सुद्धा “आंतरिक-गुणांची” पारख करून सत्यवान नावाच्या राजपुत्राला आपल्या स्वतःच्या लग्नासाठी निवडले. परंतु सत्यवान अल्पायुष्य असल्यामुळे आई-वडील व गुरूंनी या विवाहास विरोध केला. तरी पण तिने निवडलेल्या वरासोबतच आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला व सत्यवान यालाच आपली वरमाळ घातली. व त्याला पती म्हणून स्वीकारले. पुढे त्यांचे लग्न होऊन ते विवाह बंधनात अडकले.
सावित्री-सत्यवान कथा
सावित्रीने आत्मबलाने सर्वांना सांभाळले:
लग्नानंतर सावित्रीचे जीवन साधे, सरळ, सुखाचे नव्हते. त्यानंतर तिने अवघड अशी परीक्षा दिली.पतीचे प्राण वाचविण्याचे महाकठीणकाम,चिकाटीने, दुर्दम्य, इच्छाशक्तीने आणि चातुरर्याने करून दाखवले. त्यामुळे तिची आठवण आजच्या दिवशी स्मरण करून वडाची पूजा केली जाते.
वडाच्या झाडाचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व
वडाच्या पूजेचे महत्व:
हिंदू धर्माप्रमाणे वड हा पवित्र वृक्ष मानला जातो.सर्व पवित्र वृक्षांमध्ये वडाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून वटवृक्ष दिर्घायुष्य व अमरत्वाचे प्रतीक देखील आहे. तसेच वटवृक्ष हे ज्ञान व स्थिरतेचे प्रतीक आहे. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया,” मला व माझ्या कुटुंबाला व पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे!” अशी प्रार्थना करतात. धन,धान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे. अशी प्रार्थना करतात.

पर्यावरण दृष्टिकोन:
दर वर्षी आपण पाच जूनला “जागतिक-पर्यावरणदिन” साजरा करतो. वटवृक्षाचेही पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व असल्याने हा उत्सव आधुनिक विचारातून करण्यास काहीच हरकत नाही. त्यातून आपण निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करु शकतो. वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा एक निसर्ग पूजनाचा उत्तम मार्ग आहे. तो या पूजेतून साध्य करू शकतो. वडाच्या झाडाचे धार्मिक व आयुर्वेदात सुद्धा महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा वृक्ष त्रिमूर्तीचे स्वरूप मानले जाते. जसे वडाच्या झाडाच्या फांद्यांमध्ये “शिवाचे-प्रतीक” मानले जाते. तर या वृक्षाच्या सालामध्ये “विष्णूचे-प्रतीक” मानले जाते. व या वृक्षाच्या मुळामध्ये “ब्रह्माचे-प्रतीक” मानले जाते.

तसेच हे झाड वर्षानुवर्ष जगते. म्हणजे दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला “अक्षयवत” असेही नाव आहे. आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असे वर्णन याचे आयुर्वेदात केलेले आहे. अशाप्रकारे वटवृक्ष हा देवते समान मानला जातो. हा वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते.
नारीशक्ती आणि व्रताचे प्रतीक
आदर्श प्रतीक:
भारतीय संस्कृतीतील हे व्रत “आदर्श-स्त्रीत्वाचे” प्रतीक बनले आहे. कारण हे व्रत कुटुंबाच्या कल्याणासाठी व संतानप्राप्तीसाठी केले जाते.

वटपौर्णिमेची पौराणिक कथा:
ही कथा पुरातन आहे. अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्र्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर व नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या जंगलात राहणाऱ्या राजकुमाराची निवड केली.
सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारादाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नये, असा सल्ला सावित्रीला दिला होता; पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशीच विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत व सासू-सासऱ्यांसोबत राहू लागली व त्यांची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला. सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमदेव तिथे आला व सत्यवानाचे प्राण घेऊन जावू लागला. सावित्री यमाच्या मागे मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यावेळी अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास यमदेवाने सांगितले. पण तिने साफ नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमदेवाने पती सोडून तिला तीन “वर” मागण्यास सांगितले. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तीन वेळा ते देईन.

सावित्री चतुर असल्यामुळे प्रथम तिने सावित्रीने सासू-सासर्यांचे डोळे व राज्य परत मागितले. आपल्या आई-वडिलांना पुत्र व्हावा हा वर मागितला. व आपल्याला सुद्धा पुत्र व्हावा असा वर मागितला. यमदेवाने अनवधानाने तिला “तथास्तु” म्हटले. तेव्हा सावित्री आग्रह करत पतीचे प्राण मागू लागली. तुम्हीच मला मी वर देईन, तू माग असे सांगितले. तुम्ही धर्मराज आहात तेव्हा आपले वचन पूर्ण करा. अशी विनंती सावित्री करू लागली.
तेव्हा यमदेवाला आपण पूर्णपणे वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यातील या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. उपास करतात, व अशा प्रकारे वटसावित्री व्रत आचरणात आणतात. खरे तर ज्येष्ठ शुद्ध त्रायोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. तीन रात्र व्रत करावे असे सांगितलेले आहे. परंतु आधुनिक काळात वेळेअभावी हे तीन दिवस-रात्र करणे शक्य नाही. त्यामुळे फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. असे सांगितले जाते.

वटपौर्णिमा व्रत कसे करावे?
पूजा साहित्य:
2 किंवा 6 बांगड्या, गळसरी(पोत), हळद-कुंकू, शेंदूर, अक्षदा, अष्टगंध, सुगंधी अत्तर, कापून, पंचामृत पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपा-या, पैसे, गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, ओटी भरण्यासाठी गहू, सतीदेवीचा फोटो असल्यास पूजेमध्ये ठेवण्यासाठी.

पूजन विधि:
शहरामध्ये प्रत्येकच ठिकाणी “वटवृक्ष” असतोच असे नाही. किंवा वेळेअभावी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया टेरेस किंवा शक्य त्या ठिकाणी ही पूजा संपन्न करतात. तेव्हा एक पूजेचा कागद बाजारात मिळतो तो एक दोन दिवस आधी आणून ठेवला तरी चालतो.

प्रथम वडाच्या झाडाला किंवा आपण आणलेला आहे त्या कागदाला सुत तीन वेळा गुंडाळून बांधावे. त्यानंतर सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध, लाल फुल वाहून पूजा करावी. त्यानंतर सती मातेच्या फोटोचे किंवा फोटो नसल्यास सुपारीला सतीमाता म्हणून/ मानून त्याचेही पूजन करावे. वडाच्या मुळाजवळ षोडशोपचार अभिषेक करून पूजन व आरती करावी. व शेवटी वडाच्या झाडाला नमस्कार करावा. नमस्कार करताना खालील मंत्र म्हणावा.
“सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सावित्र्या सहितस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात जन्म जन्मनि।।”
स्त्रियांनी या दिवशी उपास करावा व दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नंतर तो उपास सोडावा. वडास हळदीकुंकू वाहून, आंबे, पैसे वडा पुढे ठेवून नमस्कार केल्यानंतर वडाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात. पाच सुवासिनींना ओटी भरून देताना आंबे व धान्य द्यावे. व ऐकिमेकींना हळदी कुंकू लावून शुभेच्छा द्याव्यात.

निष्कर्ष
वटपौर्णिमा हे केवळ एक धार्मिक व्रत नसून, ते भारतीय स्त्रीच्या आत्मशक्तीचे, श्रद्धेचे आणि कुटुंबप्रेमाचे प्रतीक आहे. सावित्रीसारख्या नारीने पतीसाठी केलेल्या कठीण तपश्चर्येची आठवण आपल्याला या व्रताच्या निमित्ताने होते. वडाच्या झाडाप्रमाणे आपल्या आयुष्याला बळ, सत्त्व आणि स्थैर्य मिळावे, यासाठी या पूजेचे खरे महत्त्व आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनातही महिलांनी ही परंपरा जपली आहे, आणि त्या पूजेच्या निमित्ताने निसर्ग, नाती आणि श्रद्धा यांच्याशी एक नाजूक पण गहिरी नाळ जोडलेली आहे.
ही परंपरा आपण पुढच्या पिढीकडे संस्कारासह देणं, हेच खरे व्रत आहे.
