श्री भगवान महावीर ll Shri Bhagwan Mahavir

Spread the love

श्री भगवान महावीर.

 जैन धर्मामध्ये अहिंसेचे फार महत्त्व आहे. जैन धर्मात दोन पंथ आहेत श्वेतांबर व दिगंबर. दोन्हीपंथात अहिंसेचे महत्त्व आहे.     

                     अहिंसेचीच शिकवण भगवान महावीरांनी दिलेली आहे. ते स्वतःच अहिंसेचे “मूर्तीमंत” प्रतीक होते /आहेत.

                     वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये, इक्ष्वाकू वंशात, त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ असे होते. तर, आईचे नाव त्रिशला होते. जैन परंपरेनुसार सहाव्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या भारतातील बिहार मधील कुंडलपूर येथे झाला. राजा सिद्धार्थ व राणी त्रिशाला यांच्या पोटी क्षत्रिय कुटुंबात झाला. भगवान महावीर हे लहानपणापासून तपस्वी प्रवृत्तीचे होते. भौतिक-संपत्ती,नावलौकिक, संसार, राजपाट यांचा त्यांना अजिबात मोह नव्हता. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली नगर होते. “वैशाली-नगरी” पूर्वीपासूनच खूप वैभव संपन्न होती.

               भगवान वर्धमान महावीर यांना आणखीही भावंडे होते. त्यांच्या भावाचे नाव नंदीवर्धन असे होते. तर बहिणीचे नाव सुदर्शना असे होते. त्यांचे बालपण अतिशय राजेशाही थाटात गेले. म्हणजे अतिशय सुखात गेले.तेआठ वर्षाचे झाल्यानंतर त्यांना शिक्षण व शस्त्र-विद्येचे-ज्ञान घेण्यासाठी पाठशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. त्यावेळेच्या शास्त्रशुद्ध नियमानुसार त्यांचे शिक्षण झाले होते. त्यावेळी बिहारमध्ये अर्धमागधी भाषेचे प्रचलन होत.

                 जैन धर्मातील, दोन्ही पंथांमध्ये त्यांच्या विवाह बद्दल सांगितलेले आहे. “दिगंबर” पंथांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विवाह केला नसून ते संपूर्ण ब्रह्मचारी होते. तर “श्वेतांबर” पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान वर्धमान महावीर यांनी यशोदा नावाच्या स्त्री शी विवाह केला होता. 

              महावीरांचे  कुटुंबीय जैनांचे 23 हवे तीर्थकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते. भगवान महावीर हे  स्वतः जैन धर्माचे 24 वे तीर्थकर होते. भगवान महावीर यांना अध्यात्मिकतेची आवड होती. ते सतत “आत्म-मग्न” स्थितीतच बघण्यात येत असत.भगवान महावीर अठ्ठावीस वर्षाचे असताना त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी “श्रामणी” दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. त्यांनी बारा वर्षे तप व मैनव्रत करून “आत्मज्ञान” प्राप्त केले. सततच्या “ध्यान-तपश्चर्ये”ने थोड्याच दिवसात त्यांना पूर्ण “आत्मज्ञान” झाले. त्यांनी बारा वर्षे मौन पाळले होते.एखाद्या हटयोग्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या शरीराला खूप कष्ट दिले. त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांना “केवल-ज्ञान” प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी आपले आयुष्य सर्व जनकल्याणासाठी दिले. त्यांनी ज्ञान व उपदेश देण्यास सुरुवात केली.त्यांच्या म्हणण्यानुसार “इंद्रिय” व “विषय-वासना”चे सुख दुसऱ्याला दुःख देऊनच मिळवता येते. असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी जैन धर्मातील अहिंसा, सत्य, अस्तेय,अपरिग्रह या बाबींमध्ये त्यांनी ब्रह्मचर्याचाही समावेश केला. त्यांच्यामध्ये ब्रह्मचर्याचे महत्व फार होते.

              मनुष्य जीवनातील त्याग,संयम, प्रेम करणे व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार आहेत. त्यांनी “चतुर्विध-संघाची” स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष असल्याचे सांगितले. देशात ठीक ठिकाणी फिरून महावीर यांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला.

                इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्णा अमावस्येचा. भगवानमहावीरांच्या “निर्वाण” दिवशी घराघरात दिवे लावले जातात. कारण त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी फार पूर्वी म्हणजे वैदिक काळातील तीर्थकांच्या दर्शनीक आणि नैतिक शिकवणीचा व शिक्षणाचा विस्तार व प्रचार केला. स्वतःची व जनसामुदायाची अध्यात्मिक उन्नती केली.

               अनेक प्राचीन गुहांमध्ये त्यांच्या भव्य अशा मुर्त्या सापडल्या आहेत.भगवान महावीर हे ध्यान-धारणेच्या अवस्थेत व सिंहांकित चिन्हासह अशा दोन्ही त्यांच्या मूर्ती जैन तीर्थक्षेत्री आढळून येतात.

               चैत्र शुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिवस, “महावीरजयंती” म्हणून भारतभर साजरा केला जातो. सर्व जैन धर्मीय त्यांचे “निर्वाण-पर्व” हे जैन अनुयायांची दीपावली म्हणून साजरा करतात. त्यांच्यासाठी “दिवा” अखंड लावल्या जातो. तो, आत्मज्ञानाचे प्रतीक आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केले आहे. मानव मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन त्यांनी  अनेकांतवादा मधून दिले. महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थकर म्हणून प्रसिद्ध आहेत.


Spread the love

Leave a Comment

Recommended
 सुखानंदकारी निवारी भयाते, जगी भक्ती भावे बजावे। तयाचे विवेके तजावा अनाचार हेवा…
Cresta Posts Box by CP
Index