कोणतीही गोष्ट अडली की, इसाप तिची उकल एखादी व्यवहारीक गोष्ट सांगून करायचा! हा इसापचा गुण सर्वांना खूप आवडे. त्यामुळे शेजारी-पाजारी आणि मुले लेकरे त्याची सतत हिसाबच्या अवतीभवती नेहमी गर्दी करत असायची. ते आपली अडचण सांगत आणि ईसापला आपला प्रश्न विचारीत, मग तो एखादी छोटीशी पशुपक्ष्यांची गोष्ट सांगे,आणि त्या गोष्टीमधून तो नीतीतत्त्वांचा बोध करी.
एकदा झांथसचा मुलगा नाराज होऊन, इसापला म्हणाला, “हे बघा, शेजारची मुलं दिवसभर खेळतात, दंगा करतात; पण मला मात्र माझे वडील सारखे अभ्यासात गुंतवून ठेवतात. ती कोळ्याची मुलं पहा,ती तर सतत नदीवर जातात. मासे धरतात, मजा करतात, मस्त पोहतात, आम्हाला मात्र फिरण्याची बंदी आहे. अशा स्थितीत मी वागाव तरी कसं? मी सुखी कधी होणार? फक्त सारखा अभ्यास केल्याने मला काय मिळणार?”
हे ऐकून इसापने, झाथसच्या मुलाला एका धनगराची गोष्ट सांगितली. तो म्हणाला एक होता धनगर, तो दररोज समुद्रकाठच्या एका टेकडीवर मेंढरे चारायचा. त्याला दूरवर समुद्रात,व्यापारी लोकांची भली मोठी झगमगाट असलेली गलबते दिसायची. त्याला वाटे आपला मेंढपाळाचा हा धंदा त्रासाचा आहे. कष्टाचा आहे. आणि कंटाळवाणा तर तो खूपच आहे. त्यापेक्षा आपण व्यापार करावा. समुद्रातील व्यापाऱ्यांप्रमाणे श्रीमंत व्हावे. पैसे मिळवावे आणि चैनीत राहावे.
मग त्या धनगराने स्वतःची सारी मेंढरं विकली. त्या भरपूर रकमेचा त्याने खजूर विकत घेतला. तो खजूर गलबतात भरून दूर देशाला पाठविला. त्याला मनात दुप्पट, तिप्पट, पटीने रक्कम ह्या व्यापारात मिळण्याची अपेक्षा होती. पण, हाय रे देवा! वाटेत फार मोठे वादळ झाले. ते गलबत समुद्रात बुडाले. धनगराचा सारा पैसा पाण्यात गेला. आता काय करणार? नको रे बाबा! तो व्यापार! सर्व डुबल्याने तो एकदम गरीब झाला.
त्या धनगराने मग दुसऱ्या धनगराची नोकरी धरली. आणि आता तो मधून म्हणून दुसऱ्याची मेंढरं वळू लागला! आपला धंदा सोडून दुसऱ्या सारखे वागण्याची हाव धरली तर शेवटी असा पश्चाताप होतो.” हे खरे नाही का? मला तूच मला सांग! असे तो त्या मुलाला विचारू लागला.
“धनगराची” गोष्ट ऐकून झांथसच्या मुलाचे डोळे चांगलेच उघडले.आपल्या आहे त्या परिस्थितीतच तो आनंदाने राहू लागला. त्याने इसापचे आभार मानले व तो वडिलांच्या सांगण्याप्रमाणे अभ्यास करू लागला.